मणिशंकर अय्यर म्हणाले, अफजल गुरुच्या विरोधात नव्हते पुरावे

0
10

नवी दिल्ली- संसद हल्ल्याचा दोषी क्रुरकर्मा अफजल गुरुला दिलेली फाशी न्याय घटनेची खिल्ली उडवणारी घटना असल्याचे पीडीपीने म्हटले आहे. दुसरीकडे, अफजल गुरुच्या विरोधात सरकारकडे एकही पुरावा नव्हता. तरी देखील त्याला फाशी देण्यात आली. त्यामुळे आपण दुखी झालो होतो, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आज (मंगळवारी) केले. अय्यर यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तो शमत नाही तोच पीडीपीकडून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य आले होते. संसद हल्ल्याचा दोषी अफझल गुरूला दिलेली फाशी न्याय घटनेची खिल्ली उडवणारी घटना आहे. त्याच्या अस्थी काश्मीरमध्ये आणण्यात याव्यात, अशी मागणी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) आठ आमदारांनी सोमवारी केली होती.

केंद्राने पीडीपीची मागणी फेटाळली…
जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या आठ आमदारांनी संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांना देण्याची कागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने पीडीपीची मागणी फेटाळली आहे.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, अफजल गुरुच्या अस्थीची मागणी त्याच्या कुटुंबीयांची नाही. ही मागणी राजकीय पक्षातर्फे करण्यात आली आहे, त्यामुळे ती मान्य करता येणार नाही. तसेच अफजल गुरुला तिहार तुरुंगात तीन वर्षांपूर्वी दफन करण्‍यात आले आहे.
दुसरीकडे, गीतकार जावेद अख्तर यांनी आता या प्रकरणात उडी घेतली आहे. अफजल गुरुच्या अस्थीची मागणी करण्याचा अधिकार त्याच्या कुटुंबीयांना आहे. ही मागणी पीडीपी करू शकत नसल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.