LED दिवे लावण्यात मोठा गैरव्यवहार; तर दोघांचे मंत्रीपद जाईल- संजय राऊत

0
11

मुंबई- मुंबईसह देशातील 100 शहरांत केंद्र सरकारने एलईडी दिवे बसविण्याचे काम दिले आहे. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘एलईडी’च्या पांढ-या दिव्याखाली गैरव्यवहाराचा अंधार आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणा-या अण्णा हजारे यांना उपोषणासाठी ही फिट केस आहे. या प्रकरणाचा नीट तपास झाला तर किमान दोन मंत्र्यांच्या गाडीवरील दिवे विझतील इतके हे गंभीर प्रकरण आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये ‘सच्चाई’ या सदरामधून संपादक संजय राऊत यांनी एलईडी दिव्यामंध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून केंद्र सरकारने पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीतील अंतर्गत धूसपूस आता ऐकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करण्यापर्यंत पोहचली आहे.
संजय राऊत यांनी लिहलेल्या लेखात म्हटले आहे की, 2009 मध्ये EESL (Energy Efficiency Services Ltd.) ही कंपनी भारत सरकारने स्थापन केली, पण 2014 पर्यंत या कंपनीने काहीच काम केले नाही. जून 2014 मध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी या झोपलेल्या कंपनीस जागे केले व 100 शहरांतील सध्याचे दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचे काम दिले. हे सर्व काम कंपनीच्या क्षमतेबाहेरचे होते. कारण कंपनीचे अस्तित्व तसे कागदावरच आहे. स्वत:चे कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे नाही. एलईडी दिव्यांचे उत्पादन कंपनी स्वत: करीत नाही व दिवे बसविण्याची स्वत:ची यंत्रणा नाही. कंपनी इतर खासगी कंपन्यांना सब-कॉण्ट्रॅक्ट देऊन व त्यासाठी टेंडर काढून हे काम करून घेणार. म्हणजे ज्या कंपनीला काम दिले ती ख-या अर्थाने कंपनीच नाही असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.