व्याघ्र भ्रमंती मार्ग वाचविणे आवश्यक – वनमंत्री संजय राठोड

0
54

वर्धा, दि 27 :-  वाघाचा अधिवास असणारे जंगल सर्वात समृद्ध आणि परिपूर्ण जंगल समजले जाते. वाघांसाठी गाभा क्षेत्रासोबतच त्यांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. परंतु, विकासात्मक  कामे करताना जंगलातील वाघाचे भ्रमंती मार्ग बाधित होतात. वाघांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवण्यास बाधा आणणारे विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरसुध्दा यापुढे कारवाई करू असा इशारा वनमंत्री संजय राठोड यांनी  दिला आहे.

बोर अभयारण्यातील  पुनर्वसित नवरगावची पाहणी करून बोर व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करून  वनविभागाच्या जुन्या नवरगाव येथील विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी श्री. राठोड बोलत होते.  वन विभाग, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण अशा तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी कामाचे नियोजन, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि येणाऱ्या अडचणींसंदर्भात सखोल चर्चा केली.

मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हा संघर्ष कशा पद्धतीने कमी करता येईल याबाबत त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोर व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात येणारे नवरगाव हे एकमेव गाव असून त्याचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. मात्र गाभा क्षेत्राला लागून असलेल्या 22 गावांची पुनर्वसनाची मागणी आहे. या गावांचे पुनर्वसन करून प्रश्न सुटणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  मनुष्य आणि वन्यजीव हानी टाळण्यासाठी गावांना आणि शेताला सौर कुंपण देणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.  यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

बोर प्रकल्प येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट  आणि वापरात नसलेल्या इमारती एफ डी सी एम कडे हस्तांतरित केल्यास त्याची योग्य काळजी घेऊन त्यांचा चांगला वापर करता येईल. यासंदर्भात त्यांनी स्वतः  पर्यटनमंत्र्यांसोबत चर्चा करून हा मुद्दा मार्गी लावू असे सांगितले.

प्रत्येक वनक्षेत्रामध्ये जखमी होणाऱ्या वन्य जीवांसाठी ट्रान्झिट उपचार केंद्र असणे आवश्यक आहे. यामुळे प्राण्यांना तात्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविता येऊ शकतात . असे केंद्र सुरू करण्यासाठीसुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊ असेही श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

बोर व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात येणारे नवरगावचे पुनर्वसन आदर्श पुनर्वसन झाले असून या खात्याचा मंत्री म्हणून वनविभागाच्या या पुनर्वसनाच्या कामाचे त्यांनी कौतुक करून अशा कामाचा  अभिमान असल्याचे सांगितले. या पुनर्वसनाबाबत गावकऱ्यांशी त्यांनी चर्चा करुन त्यांची सुद्धा मते जाणून घेतली. गावकऱ्यांनी याबाबत  समाधान व्यक्त केले.यावेळी मुख्य वन संरक्षक तथा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नागपूरचे पी कल्याणकुमार, नागपूरचे सामाजिक वनीकरण वनसंरक्षक श्री मानकर, वर्धा उपवन संरक्षक सुनील शर्मा, वर्धा सामाजिक वनीकरण वनसंरक्षक श्री जोशी, नागपूर वन्यजीव  बोर अभयारण्यचे  विभागीय वनाधिकारी आर बी गवई तसेच वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.