विनोद सुरसावंत/ककोडी,दि.17ःजिल्ह्यातील धानउत्पादक शेतकरी शासनाच्या आडमुठे धोरणामुळे मेठाकुटीस आला असून शासकीय धान खरेदी केंद्रावर लादलेल्या जाचक अटी आणि एसआयटी तपासामुळे अद्यापही धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने ककोडी परिसरातील शेतकरी 1000 ते 1200 रुपये क्विंटल दराने धानाची विक्री करण्यास मजबूर झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.देवरी तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने धान खरेदी केली जाते,मात्र यावेळी या संस्थाची चौकशी सुरु असल्याने संस्थानी अद्यापही धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने व्यापारी पडक्या दरात धानाची खरेदी करुन लुटमार करीत असल्याचे दिसून येत आहे.या सर्व प्रकाराला जिल्हाप्रशासन जबाबदार असून जिल्हाधिकारी यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकरी संकटात सापडल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ककोडी व ककोडी चा दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक लुट होत आहे. ककोडी व परिसरातील शेतकर्यांचे धानाची मळणी ९०% पुर्ण झाली असून दिवाळी सण साजरा करुन शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दिवाळी सणाच्यापुर्वी व्यापारी व दलालांनी पडक्या दरात शेतकर्यांची लुबाडणूक करुनही लोकप्रतिनिधी व प्रशासन गप्प बसले आहे.