गोंदिया : वन्य प्राण्यांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सुरेंद्र कळईपार यांना जीव गमवावा लागला. स्थानिक लोकांचे जंगलावर प्रथम अधिकार आहे. शासनाने वन्य प्राण्यांची काळजी घ्यावी, त्यासाठी जंगल परिसराला कुंपण घालावे. असे मार्गदर्शन माजी आ. दिलीप बंसोड यांनी उप वनसंरक्षक राऊत यांना निवेदन देतेवेळी केले.
गोंदियाचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आ.दिलीप बंसोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी वनसंरक्षक राऊत यांना निवेदन देण्यात आले. त्यात हत्तीमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित मदत करण्यात यावी, अशी मागणी करून वन क्षेत्रात जीवन जगणार्या शेतकर्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
20 लाख रुपये मदत देणे तसेच मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी. शेतपिकाचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 60 हजार रुपये अशी आर्थिक मदत देणे, रानडुक्कर व रानगवे यांच्यामुळे होत असलेल्या शेतपिकाच्या नुकसणीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देणे, वन जमिनी पट्टेधारकाच्या शेतात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देणे आदि मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.
याप्रसंगी माजी आ.दिलीप बंसोड यांच्यासह भागवत पाटील नाकाडे, अनिल दहिवले, नरूले, जगदीश पवार, देवाजी कापगते नवेगावबांध, चंद्रशेखर ठवरे, विशाखा साखरे, विजय खोब्रागडे, मोरेश्वर सोनवणे चान्ना, राहुल ठवरे, कनसा रामधिकुवर, मृतकाचे नातेवाईक, प्रदीप शहारे, इन्द्रदास झीलपे, श्रीकांत घाटबांधे जिप सदस्य, घनश्याम धामट, प्रीतम रामटेके, सलाम आणि तिडका येथील बहुसंख्य कार्यकर्ते व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.