वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करुन सोई-सुविधा व सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

0
8

 गोंदिया, दि.31 : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करुन औद्योगिक व कृषि क्षेत्रास अन्नधान्याची नासाडी होऊ नये म्हणून साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी वखार महामंडळाची 8 ऑगस्ट 1957 ला निर्मिती करण्यात आलेली आहे. महामंडळाद्वारे शेतीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके यांची शास्त्रोक्त पध्दतीने सुरक्षीत साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. महामंडळाची मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, लातुर ही आठ विभाग आहेत. राज्यातील महामंडळाची एकूण 205 वखार केंद्रावर 1173 गोदामांची साठवणूक क्षमता 20.40 इतकी असून नागपूर विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात तुमसर, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, चंद्रपूर (पडोली), चंद्रपूर (औ) व वरोरा, गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व वडसा (देसाईगंज), गोंदिया जिल्ह्यात आमगाव व अर्जुनी मोरगाव, नागपूर जिल्ह्यात वाडी-हिंगणा, बुटीबोरी, काटोल व सावनेर तसेच वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, कारंजा (घाडगे), वर्धा (शिवनगर) व वर्धा (औ) अशाप्रकारे सहा जिल्ह्यात एकूण 18 वखार केंद्रावर 114 गोदाम असून साठवणूक क्षमता 2.03 मे. टन इतकी आहे.

        शेतमाल उत्पादन बरोबरच शेतमालाची सुरक्षीत साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे. सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषिमालाच्या साठवणुकीस प्राधान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामांमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते. ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखार पावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास, ठेवीदारांना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ सहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणुकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालु पिकांचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलीत साठवण दराच्या 50 टक्के सवलत देऊन 25 टक्के जागा आरक्षीत करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रत्येक पंधरवाड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकांचा वापर करुन माल सुरक्षीत ठेवण्यात येतो. साठवणुकीस असलेल्या सर्व मालाचा 100 टक्के विमा संरक्षण दिल्या जाते, त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

        याशिवाय वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेकरीता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटी द्वारे जमा करण्यात येते. सदर तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाईन  तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने संबंधित शेतकरी/ठेवीदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन सुभाष पुजारी, विभाग प्रमुख, नागपूर विभाग, नागपूर यांनी केले आहे.