पुन्हा एक वाघ कायमचा पिंजऱ्याआड….

0
53

नागपूर : राज्याच्या वनखात्याला वाढलेले वाघ सांभाळता येत नाही. मानव-वन्यजीव संघर्ष त्यांना अजूनपर्यंत थांबवता आलेला नाही. संघर्ष झाला की गावकऱ्यांचा आक्रोशाला सामोरे जाण्याऐवजी त्या वाघाला जेरबंद करायचे, असेच धोरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसात तीन वाघांना जेरबंद केले असून याच निर्णयामुळे एका वाघाचाही जीवही गेला आहे.

राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या दशकभरात शिगेला पोहोचला आहे. संरक्षित वाघांच्या स्थानांतरणाचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला, पण ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. वाघाने माणसाचा बळी घेतला की त्याला जेरबंद करायचे, हीच मोहीम सध्या वनखात्याने सुरू केली आहे. एकदा जेरबंद केलेला वाघ मग कायमचा जेरबंद झाला तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही. निमढेला परिसरातील वाघ धुमाकूळ घालतो म्हणून त्याला जेरबंद करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी परिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याने निमढेला उपक्षेत्रातील जंगला लगत व गावामध्ये धुमाकूळ घालून तीन लोकांना ठार केले. यात बेंबळा येथील सूर्यभान कटू हजारे, निमढेला येथील रामभाऊ रामचंद्र हनवते आणि खानगाव येथील अंकुश श्रावण खोब्रागडे या तीन ग्रामस्थांचा समावेश होता. या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, सहाय्यक वनसंरक्षरक श्री. वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करण्यात आले. शनिवारी, १८ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र (बफर) खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेला मधील कक्ष क्रमांक ५९ मध्ये भानुसखिंडी वाघाच्या बछडयाला पकडण्यात आले.