सामान्य निरीक्षक व जिल्हाधिकारी यांचा रॅलीत सहभाग
भंडारा, दि. 14: जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. नवमतदारांनी मतदान तर करायचेच आहे शिवाय त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावायचे आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आज येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून भंडाऱ्यात आज वॉक फॉर डेमोक्रेसी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकिंग रॅलीमध्ये सामान्य निरीक्षक दिलीप कुमार गुप्ता यांनी देखील सहभाग घेतला. शुभारंभ सामान्य निरीक्षक श्री. गुप्ता जिल्हाधिकारी श्री. कोलते, पोलीस अधीक्षक नुरल हसन, यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक राहुल गवई, स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे, त्यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नोडल अधिकारी विभाग प्रमुख मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
श्री. कोलते म्हणाले, मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा मुलभूत अधिकारी असून मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य आहे. जिल्ह्यातील महिला, युवा, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने मतदान करुन या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग व्हावे. तसेच मतदान हा आपला सर्वांचे मूलभुत अधिकार असून ते आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने सर्वांनी आपले हे कर्तव्य अवश्य बजावावे. नागरिकांना मतदानाच्या वेळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाही दिंडी व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना प्रतिज्ञा देण्यात आली. मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी कलावंतांनी समृद्ध लोकशाहीसाठी मतदान आवश्यक असल्याचा संदेश त्यांच्या कलेतून दिला.
या रॅलीत नागरिक,विद्यार्थी यांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मी मतदान करणार, समानतेचे हे मूल्य बळकट करु या, लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवूया, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे, मतदान हे आपले आद्यकर्तव्य आहे. हक्क बजावून कर्तव्य करा आदि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी यांनी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.