अर्जुनी-मोर.-पिंपळगाव (खांबी) येथे आयोजित परिवर्तनशील साहित्य संमेलन अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या संमेलनात आमदार राजकुमार बडोले यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इतर महापुरुषांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन केले.
युगपुरुष युवा मंच पिंपळगाव/खांबी च्या वतीने ता.८ आयोजित हे परिवर्तनशील साहित्य संमेलन तिन सत्रात आयोजित करण्यात आले.यामधे प्रबोधनात्मक कार्यक्रम, रोगनिदान शिबीर,तथा रात्रौ राष्टीय प्रबोधनकार भाग्यश्रीताई इंगळे यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार बडोले म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले शिक्षण, समता, स्वातंत्र्य व बंधुतेचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. परिवर्तनशील साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून समाजातील अन्याय, शोषण आणि विषमता दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे.”ते पुढे म्हणाले की, “साहित्याच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करून नव्या पिढीला सकारात्मक विचारांची दिशा देणे ही काळाची गरज आहे. परिवर्तनशील लेखक व विचारवंतांनी समाजातील दुर्बल घटकांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.”
या संमेलनात समाजातील परिवर्तन, सामाजिक न्याय, समतेचा विचार, संविधान मूल्यांची जोपासना आणि नव्या पिढीमध्ये वैचारिक प्रबोधन या विषयांवर सखोल चर्चा झाली. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमात लायकराम भेंडारकर जि.प. अध्यक्ष, नितेष बोरकर सामाजिक कार्यकर्ता, दिलवर रामटेके, लैलेश्वर शिवणकर,उपसभापती संदिप कापगते, दानेश साखरे, रत्नदिप दहिवले, व्यंकर खोब्रागडे,पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, प्रभाकर दहिकर, प्रमोद डोंगरे, सचिन डोंगरे, विलास पुंडे, प्रदिप कांबळे, सरीता रामटेके, किशोर बेलखोडे, धम्मदिप मेश्राम, बुध्दरत्न रामटेके, अॅड. मंदिप रामटेके, संघर्ष नंदागवळी, ईश्वर खोब्रागडे, राकेष भास्कर, निरुता मेश्राम, विवेकानंद मेश्राम, नितिन कांबळे, हेमराज बडोले, उमेष प्रधान, अरविंद खोब्रागडे, नानाजी रामरेके, नागेष कांबळे, नानेश्वर खोब्रागडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आपल्या मनोगतातून परिवर्तनशील साहित्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “साहित्य हे समाजातील वंचित, पीडित घटकांना न्याय मिळवून देण्याचे प्रभावी साधन आहे. अशा संमेलनांमुळे वैचारिक क्रांतीला चालना मिळते.”कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानण्यात आले.





