कचरागाडीसाठी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन

0
9

सडक-अर्जुनी,दि.07 : नगर पंचायत अंतर्गत रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे या कचऱ्याला कंटाळून येथील महिलांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.सडक-अर्जुनी नगर पंचायतला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु अजूनपर्यंत शहरामध्ये कचरा गाडीची व्यवस्था करण्यात आली नाही. मागील दोन वर्षापासून सर्व महिला आपली समस्या नगराध्यक्षांंना सांगून थकल्या आहेत. पण यावर कुणीही लक्ष देत नाही. फक्त कारणे सांगून मोकळे होतात. ही समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सडक-अर्जुनीचे मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्यात मतभेद आहेत. याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कचरा महिलांसाठी गंभीर समस्या झाली आहे. या कचऱ्यामुळे एकमेकांच्या घरासमोर कचरा टाकल्यावरुन महिलांची भांडणे होत आहेत. कचऱ्यामुळे डास, साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्यांतील मलमा २५ दिवसांपासून रस्त्यावर पडला असल्यामुळे लोकांना ये-जा करण्याकरिता खूप त्रास होत आहे. शासन स्वच्छता मोहीम राबवितो. परंतु भाजपचे वर्चस्व असलेल्या सडक-अर्जुनीत अस्वच्छतेने लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सडक-अर्जुनी येथे कचरागाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रत पालकमंत्री राजकुमार बडोले, नगराध्यक्ष, सभापती स्वच्छता नगर पंचायत कार्यालय सडक-अर्जुनी, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली आहे.