ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा: उपविभागीय अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन

0
15

 

 

 

देसाईगंज दि. 8 : गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करून ते आता सहा टक्क्यावर आणण्यात आले आहे. ओबीसींचे आरक्षण प्रचंड कमी केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसेनेच्या वतीने देसाईगंज येथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून ओबीसींना पूर्ववत १९ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना संधी देऊन बाहेर जिल्ह्यातील भरती १५ वर्षासाठी बंद करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ओबीसींना सहा टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यात नोकरभरती होताना येथील ओबीसींना संधी मिळत नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना नोकरभरतीत बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदू चावला, माजी तालुका प्रमुख विठ्ठल ढोरे, ज्ञानेश्वर कवासे, माजी जि. प. सदस्य दिगांबर मेश्राम, रामचंद्र मोहुर्ले, विकास प्रधान, डॉ. श्रीकांत बन्सोड, विलास ठाकरे, विजय सहारे, मंगेश चौधरी, जसपाल चावला, महिला आघाडी तालुका प्रमुख सरिता शिवरकर, माया मोहुर्ले, मुन्ना नागलवाडे, तानाजी कुथे, आरमोरीचे तालुका प्रमुख माणिक भोयर, युवा सेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, दादाजी दाणे, शैलेश चिटमलवार, जयंत दहीकर व कार्यकर्ते हजर होते.

कोरची येथे तहसीलदारांना निवेदन

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या मागणीसाठी कोरची येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख अशोक गावतुरे, तालुका प्रमुख चेतानंद किरसान, पद्माकर मानकर, संघटन प्रमुख राकेश पारटवार, महिला प्रमुख कौशल्या काटेंगे, प्रतिभा भजणे, योगेश मेश्राम, दिलीप कुलसंगे, शालिनी आदे, अवधराम बागमूळ, रमेश मानकर, बिजलाल उसेंडी, भारतसाय कुंजाम, उईके, नुरूटी, कावळे, कोराम, मडावी हजर होते.