जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

0
10

भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद भंडाराची सर्वसाधारण सभा आज पार पडली. वित्तीय वर्षाची तथा सदस्यांच्या पंचवार्षीक योजेतील ही अखेरची सभा विविध मुद्यांनी गाजली.

जिल्हा परिषद सभागृहात सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी या होत्या. यावेळी उपसभापती रमेश पारधी, महिला बाल विकास सभापती रेखा भुसारी, अर्थ व बांधकाम सभापती संजय गाठवे, कृषि सभापती संदीप टाले, समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे या पदाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषद सभापतींनी त्यांना माहिती अवगत करून देण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के सुटीवर महाबिजची बियाणे देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी लावून धरली. यावेळी डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी महाबिजची बियाणे बोगस असल्याचा आरोप लावून अन्य कुठल्याही कंपनीची बियाणे पुरवठा करण्याची मागणी केली.

खरीप हंगामासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना कृषि विभागाने बियाणांचा पुरवठा करावा व यासाठी जिल्हा परिषदने तरतुद करण्याची मागणी लावून धरली. यावर उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी बियांसाठी सहा कोटींची गरज असल्याचे सांगून तशी तरतुद करण्याचे आश्वासन दिले. मात्र सर्व शेतकऱ्यांना सुटीवर बियाणे दिल्यास जे ३० टक्के शेतकरी स्वत:चे बियाणे वापरतात असेही शेतकरी मोफत बियांणांची मागणी करतील यामुळे काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे कृषी सभापती संदीप टाले यांनी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या शेतीचे संरक्षणासाठी शासकीय योजनेतून संरक्षण जाळी पुरवठा करण्याची मागणी सभापती शेख व गीता कापगते यांनी लावून धरले. जिल्ह्यातील साकोली लाखांदूर व लाखनी या तीन तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता मिळतो. त्याच धर्तीवर या तालुक्यांच्या विकासासाठी शासनाने नक्षलभत्ता विकास निधी मिळावा, अशी मागणी भरत खंडाईत यांनी रेटून धरली.

विकास निधी मिळत नसल्यास नौकरदार वर्गांचा नक्षलग्रस्त भत्ता बंद करण्यासंदर्भात सभेने ठराव पारित करावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. अनेक गावात विकासाची गरज नसतानाही केवळ मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी विकासाच्या नावाने कामे सुरू असल्याचा आरोप वसंता एंचिलवार यांनी लावून धरला.