जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द -पालकमंत्री राजकुमार बडोले

0
24

गोंदिया येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर २६ जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला अनेक संत समाजसुधारकांनी दिशा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील वंचित व दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.बडोले पुढे म्हणाले, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सन २०१८-१९ मध्ये धान पिकावर आलेल्या मावा तुडतुडा रोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३८ कोटी १३ लक्ष रुपये वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील मध्यम स्वरुपाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २४ कोटी ४७ लक्ष रुपये वाटप करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार २७६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी ८३ हजार ९७४ पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलक्रांती घडण्यास मदत होत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, सन २०१८-१९ या वर्षात १६५ गावांची निवड करण्यात आली असून गावांचे पाणलोट आधारीत गाव आराखडे तयार करण्यात आले आहेत. ३ हजार ८२ कामांचा ९४ कोटी ६२ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ३ हजार ६२ कामांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यापैकी ५७३ कामे सुरु करण्यात आली असून २७६ कामे पूर्ण झाली आहेत तर २९७ कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. परेड कमांडर म्हणून पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम सहभागी होत्या. परेडमध्ये पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक नियंत्रण पथक, पुरुष व महिला होमगार्ड, विशेष व्याघ्र जंगल पथक, राष्ट्रीय छात्रसेना पथक, महाराष्ट्र छात्रसेना पथक, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, निर्भया पथक, फिरते न्यायवैदयक पथक व बॉम्ब शोधक पथकाचा समावेश होता. तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवा, अग्नीशमन दल, सामाजिक वनीकरण विभागाचा चित्ररथ व राष्ट्रीय हरित सेना पथक यांनीही यामध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिश बैजल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच भारत सरकारच्या तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता सर्व उपस्थितांकडून तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.