तिरोडा,दि.29 : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सिंचनावर विशेष भर देऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यावर विशेष भर देऊन सिंचनाकरिता विशेष निधी दिलेला आहे.त्याकरिता लघुसिंचन, जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव, तलाव खोलीकरण व पुनरूज्जीवन, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, उपसासिंचन प्रकल्पांना विशेष निधी पुरविणे, भातखाचर दुरुस्ती कार्यक्रम, मग्रारोहयो माध्यमातून रस्ता खडीकरण, तसेच तिरोडा शहराकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता पाइपलाइन योजनेकरिता २७ कोटी रुपये निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. या कामाला सुरुवात झालेली आहे. याबरोबरच केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून सुरक्षा करीत वृक्षतोड थांबविल्याचे निदर्शनास आले असून पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. फडणवीस सरकारच्या नेतृत्वामध्ये सर्व विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेस थेट फायदा डीबीटीच्या माध्यमातून कसा होईल यावर भर दिला गेला आहे. महसूल विभागाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे सातबारा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये हस्तांतरित करून वर्ग १ च्या सातबारा उताऱ्याचे वाटप वचनपूर्ती मेळावा कार्यक्रमात आ. विजय रहांगडाले यांनी लाभार्थ्यांना संबोधित केले. तिरोडा तालुक्यातील जि.प. अर्जुनी, सेजगाव व कवलेवाडा क्षेत्र अंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, कृउबास सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, उपसभापती डॉ. वसंत भगत, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, कृउबास संचालक चत्रभुज बिसेन, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सरपंच कमलेश अतिलकर व लाभार्थी उपस्थित होते. .