माता-बाल मृत्यू नियंत्रणात आशा सेवकांची उत्कृष्ट कामगिरी-आ.अग्रवाल

0
13

गोंदिया ,दि.०९:: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा शुभारंभ कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात केला. यांतर्गत माता-बाल मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आशा सेविका देशातील गावागावांत सेवा देत आहेत. शासनाच्या आरोग्यासंबंधी योजनांना घरोघर पोहचविण्याचे कार्य त्या पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, माता-बाल मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आशा सेविकांची उत्कृष्ट कामगिरी असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल  यांनी केले.आशा दिनानिमित्त येथील पंचायत समितीत बुधवारी आयोजित आशा सेविका संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मनोज राऊत, खंडविकास अधिकारी जे.एम.इमानदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, आशा सेविकांना कामाच्या जबाबदारीच्या तुलनेत शासनाकडून अपेक्षेपेक्षा कमी मानधन दिले जात आहे. या विषयाला आम्ही वेळोवेळी शासनापुढे मांडले. आशा सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी भविष्यातही प्रयत्न केले जातील असे सांगीतले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माजी सभापती विमल नागपुरे, सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे व अन्य उपस्थित होते.