सन्मान योजनेत या हाताने घ्या अन द्या

0
20

गोंदिया,दि.02 :आम्ही मागीतले नाही तरी निवडणूकीच्या तोंडावर सन्मान योजनेच्या नावावर आपण आम्हाला लॉलीपॉप देत आहात. शेतकऱ्यांना मूर्ख बनविणे हा राज्यकर्ताचा गुणधर्मच आहे. आम्ही मागणी घालत नाही. तुम्हीही देऊ नका पण शेतकऱ्यांची ही थट्टा आतातरी थांबवा हो अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेच्या नावावर या हाताने घ्या अन दुसर्या हाताने परत द्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे.बँकेत पैसे जमा झाल्याचा संदेश येतो आणि लगेच निघाल्याचाही येत असल्याच्या चर्चेने या योजनेवरच शंका निर्माण झाली आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आणली. एका डौलदार कार्यक्रमात देशातील शेतकºयांना तीन हिस्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर २४ फेब्रुवारीला आला. संदेश वाचून हायसे वाटले. हा संदेश फेकू असेल असे कुणाला ठाऊक? बँकेत गेल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसेच नाही. बँक व्यवस्थापनाला विचारणा केली तर ते तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा सल्ला देतात. शेतकरी बँकेत येतात व निराश होऊन आल्यापावलीच नाहक आर्थिक व शारीरिक खर्च करुन परत जातात. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बँकेतून पैसे जमा झाल्याचा संदेश येतो. मात्र ते पैसे परत गेल्याचा संदेश येत नाही व बँक खात्यातही पैसे जमा होत नाही. असा हा प्रकार इटखेडा येथील प्रमोद महादेव गोंडाणे या शेतकऱ्यांशी घडला आहे. त्यांच्या स्टेट बँक शाखेच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश आला. मात्र चौकशी केली तेव्हा खात्यात पैसेच जमा झाले नसल्याचे कळले. योजनेचे नाव शेतकरी सन्मान असले तरी मात्र अपमानच पदरी पडल्याचा अनुभव शेतकºयांना येत आहे.