भंडारा,दि.10 : निसर्गाची अवकृपा आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प मिळणाऱ्या मोबदल्याने भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे धानाला ५०० रूपये बोनस घोषित करण्याची मागणी भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंबईत या विषयावर त्यांनी मुख्यमंत्र्याशी सविस्तर चर्चा केली.भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गीक संकटाचा सामना करत आहे. शासनाने घोषित केलेली आधारभूत अत्यल्प आहे. यात शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नाही. दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे. आणि प्रत्यक्ष हाती येणारी उत्पन्न यात मोठी तफावत आहे. युती सरकारच्या काळात सलग पाच वर्ष धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी अवलंबिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे आमदार भोंडेकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या धानासाठी ५०० रूपये बोनस देण्याची मागणीही निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी केली आहे. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.





