अर्जुनी मोरगाव,दि.02ः- देशात ओबीसीमध्ये मोडणार्या माळी,तेली,कुणबी,सोनार,लोहार,कोहळी,पोवार,धनगरसह इतर जातींची शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक, राजकीय प्रगती थांबली असून विकासासाठी स्वतंत्र ओबीसीतील जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती अर्जुनी-मोर तालुका शाखेच्या ओबीसी नेते व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष,अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांना(दि.01)देण्यात आले. तालुक्यातील बोदरा देऊळगाव येथे ओबीसी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता आले असता निवेदन देण्यात आले.यावेळी ना.भुजबळ यांनी आपल्या सर्वांना जन आंदोलन करून ओबीसीची शक्ती गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत दाखवावी लागणार असल्याचे सांगत निवेदनाची दखल घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुका सचिव उद्धव मेहेंदळे ,तालुकाध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे,भागवत पाटील नाकाडे,सुभाष देशमुख,इंद्रदास झिल्पे,दिपक सोनवणे,विनायक राखडे,हेमराज पुस्तोडे आदी ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.