आमदारांना विश्वासात न घेणे ही मनमानीच !

0
7

चंद्रपूर दि. ८: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली यासाठी आपला विरोध नाही. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदरांना विश्वासात न घेता आणि दारूबंदी समितीच्या अहवालावर विधानसभेत जराही चर्चा न करता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. आमदराना विशफ्वासात न घेऊन जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे मनमानीच आहे, अशी टीका शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली.
जिल्ह्यातील दारूबंदी निर्णयाच्या विरोधात शिवसेना आमदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र लिहिले असून, दारूबंदीचा निर्णय योग्यपणे न झाल्याला वित्तमंत्र्यांना जबाबदार ठरविले आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने वित्तमंत्र्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदाराला यात विश्वासात घेण्याची गरज त्यांना वाटली नाही.
दारूबंदीच्या निर्णयासाठी गठीत करण्यात आलेल्या देवतळे समितीकडून दारूबंदीची तीन टप्प्यात शिफारस केली होती. विधानसभेत या अहवालावर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र अहवालावर कसलीही चर्चा न करता राज्य सरकारने निर्णय जाहीर करून मनमानी चालविली आहे.आमदार बाळू धानोरकर म्हणाले, दारूबंदीला आपला विरोध नाही. दारूची सर्वाधिक समस्या ग्रामीण भागात होती. त्यामुळे, गाव-तालुका आणि जिल्हा अशी टप्प्याने दारूबंदी करणे गरजेचे होते.यामुळे पोलिसांवरही ताण पडला नसता. दारूबंदीच्या अंमलबजावणीतील अडचणीही यातून दूर करता आल्या असत्या.
दारूबंदीच्या यशस्वीतेमध्ये अडचणी दिसत असल्याने या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे सांगून ते म्हणाले, बळजबरीने दारूबंदी शक्य नाही. दारूबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी सुनियोजितपणे अंमलबजावणी व्हायला हवी होती. यातील कमतरतेमुळे शेकडो युवक अवैध दारू व्यवसायात जुळले असून यातून नवे माफिया जन्मास येण्याची भीती बळावल्याचे ते यावेळी म्हणाले.