
गोरेगाव- तालुक्यातील गोवारीटोला येथील शेत-शिवारात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने धान मळणी यंत्रासह 5 एकरातील तणस (जनावरांचा चारा) आणि विविध शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज, बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.या घटनेत सदर शेतकऱ्याचे सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दयानंद हरीणखेडे रा. गोवारीटोला असे शेतकऱ्यांचे नाव असून हरीणखेडे यांच्या कुटुंबात लग्न समारंभ असल्याने ते घरी लग्न कार्यात व्यस्त असताना त्यांच्या शेतात आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी शेताकडे धाव घेतली असता तोपर्यंत गोठ्यात ठेवलेले, रोप पाईप, तणस व इतर साहित्यांसह गोठ्याशेजारी ठेवलेली धान मळणी यंत्र आदी जळून खाक झाले होते. गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. सुदैवाने आग लागताच गोठ्यातील जनावरे स्वतःहून बाहेर निघाली त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकरी दयानंद हरीणखेडे यांचे जवळपास 3 ते 4 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती स्थानिक तलाठ्याला देण्यात आली आहे. शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने केली जात आहे.





