
तिरोडा:- तिरोडा तालुक्यात माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांना यश येऊन नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी २१.०० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यात एकूण २३९५ शेतकरी एकूण क्षेत्र ८३७.५५ हेक्टर व ऑक्टोंबर महिन्यात २६०५२ शेतकरी एकूण क्षेत्र ११०५३.८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. मंजूर करण्यात आलेली ही रक्कम संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक शेतक-यांच्या खात्यात भरपाई जमा देखील झाली आहे. या मदतीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.आमदार विजय रहांगडाले यांनी प्रशासनाशी सातत्याने बैठक घेत, पंचनामे लवकर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या व पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. शेतक-यांना वेळेत मदत मिळावी हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मंजूर झालेली ही मदत शेतक-यांना पुन्हा उभारी देणारी ठरेल, असा विश्वास आमदार रहांगडाले यांनी व्यक्त केला.या निर्णयाबद्दल परिसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आमदार विजय रहांगडाले यांचे आभार मानले आहेत.




