
; लग्न कार्याला जाताना घडला अपघात
अर्जुनी-मोर. – तालुक्यातील नवेगाव/बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण-भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ११) सायं. अंदाजे ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.
अंकुर अरुण शहारे (वय-१५, रा. देवरी) आणि ऋतिका संजय जांभुळकर (वय-१०, रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी) अशी मृत झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. तर अरुणा अरुण शहारे (वय-४०, रा. देवरी) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्यास होते. ऋतिका ही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. वडिलांच्या कोरोना काळातील निधनानंतर घरची जबाबदारी आई अरुणा यांच्या अंगावर होती.
दरम्यान, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोळदे येथे नातलगांच्या लग्न समारंभासाठी ते तिघे दुचाकीने देवरीहून बोळदे येथे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास नवेगाव/बांध येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. या भीषण अपघातात अंकुर शहारे व ऋतिका जांभुळकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अरुणा शहारे या गंभीर जखमी झाल्या.
जखमींना तात्काळ उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नवेगावबांध पोलीस पुढील तपास करीत आहेत.





