
दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा…
धाराशिवच्या मातीत दुष्काळ नवा नाही…उन्हाळ्याची चाहूल लागली की गावागावातील विहिरींचा तळ दिसू लागतो, बोअरवेल कोरड्या पडतात,टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटू लागतात.आकाशात ढग दाटले तरी पाऊस हमखास पडेल याची शाश्वती उरलेली नाही.बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वर्षानुवर्षे घटत चाललेली भूजल पातळी यामुळे धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्यासमोर जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
अशा परिस्थितीत “जलतारा अभियान” हे केवळ प्रशासनाचे अभियान न राहता आशेचा नवा किरण ठरत आहे.कारण ही मोहीम फक्त पाणी अडविण्याची नाही,तर भविष्य वाचविण्याची आहे… पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी उभा राहिलेला सामूहिक संकल्प आहे. पाणी म्हणजे केवळ तहान भागविणारे साधन नाही; ते शेतीचे जीवन,जनावरांचा आधार,ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि पर्यावरणाचा श्वास आहे.म्हणूनच आज “पाणी अडवा,पाणी जिरवा” ही संकल्पना घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे. जलतारा अभियानातून धाराशिव जिल्ह्यात हीच जाणीव लोकांच्या मनामनात रुजताना दिसत आहे.
गावोगावी तलाव,नाले,ओढे,विहिरी आणि शेततळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.गाळ काढणे,नाले खोलीकरण,बंधारे उभारणे,वृक्षारोपण, जलस्रोत स्वच्छता आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत. ज्या विहिरी काही वर्षांपूर्वी एप्रिलमध्येच कोरड्या पडत होत्या,त्या आता अधिक काळ पाण्याने भरलेल्या राहू लागल्या आहेत.काही भागांत भूजल पातळी वाढल्याचेही चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या अभियानाने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.पूर्वी पाणीटंचाई आली की फक्त शासनाकडे मदतीची अपेक्षा ठेवली जात होती; मात्र आता गावकरी स्वतः पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामांत उतरू लागले आहेत.युवकांचे श्रमदान, महिला बचत गटांचा सहभाग, शेतकऱ्यांचे नियोजन आणि सामाजिक संस्थांची साथ यामुळे “जलतारा” आता लोकचळवळ बनू लागले आहे.
धाराशिवसारख्या जिल्ह्यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे.कारण येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार भूजलावरच आहे.पावसाचे पाणी जमिनीत मुरले तरच विहिरी आणि बोअरवेल जिवंत राहू शकतात.त्यामुळे पडणारा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे ही आता निवड नसून अपरिहार्यता बनली आहे.





