
परभणी, दि. 3 : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. जिल्हास्तरीय नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस पोलीस, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अमली पदार्थांचा प्रश्न हा सामाजिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बैठकीत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हे, जप्तीची कारवाई आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
संवेदनशील ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविणे, पानटपऱ्यांची तपासणी करणे, औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी औषधी दुकानांची नियमित तपासणी करून संशयित प्रकरणांमध्ये पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.





