
देवरी-आमगाव मार्गावरील बोरगाव जंगल शिवारातील बेलबोडी परिसरात गुरुवारी (दि. १९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अर्टिका चारचाकी वाहन पलटी होऊन मोठे नुकसान झाले. मात्र वाहनातील पाचही प्रवासी सुदैवाने बचावल्याने मोठी जीवितहानी टळली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील धमतरी येथील रहिवासी असलेले काही नागरिक अर्टिका वाहनाने बालाघाट येथून आपल्या गावाकडे परत जात होते. देवरी-आमगाव राष्ट्रीय मार्गावरील ग्राम बोरगाव जंगल शिवारातील बेलबोडी परिसरात वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पुढील व बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःथास सोडला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अपघातामुळे काही काळ वाहतूकीवर परिणाम झाला होता. नंतर वाहन हटवून वाहतूक सुरुळीत करण्यात आली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा जंगल परिसरातील वळणदार रस्त्यांवर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वाहनधारकांचे आर्थिक नुकसात झाले आहे




