नांदेड दि. १६ –जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या पाच गावातील गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदानावर बहिष्कार घातलाय. मुख्य रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी पाच गावातील गावकऱ्यांनी हा पवित्रा घेतला.उमरीमधील सोमठाणा फाटा ते तुराटीपर्यंतच्या 17 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर बितनाळ, बोथी, सावरगाव, मोखंडी आणि तुराटी या पाच गावांचा या बहिष्कारात समावेश आहे.या पाच गावांच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालीय. हा रस्ता नीट व्हावा यावा यासाठी अनेक वर्षांपासून या गावातील गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. पण गावकऱ्यांना फक्त आश्वासनंच मिळाली. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालून राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींना आपली दखल घेण्यास भाग पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.





