नांदेड,दि.20- महानगरपालिकेकडुन शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत, शहरातील अनेक भागातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी का दुर्लक्ष केले आहे यापासून नागरिकांना होणारा त्रासास कोण जबाबदार असा सवाल पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी करून आयुक्त गणेश देशमुख यांना बैठकीतच धारेवर धरले.
पालकमंत्री अर्जुन खोतकर मंगळवारी दि. 20 रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या नियोजन भवन येथे दुपारी 3 च्या सुमारास जिल्ह्यातील सर्व विभागाच्या विभागप्रमुखांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत प्रत्येक विभागाचा आढावा पालकमंत्री महोदय यांनी सविस्तर घेतला. या बैठकीला आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.प्रदीर्घ काळ चाललेल्या बैठकीत पालकमंत्री खोतकर यांनी सुरूवातील कचऱ्याच्या विषयावरून आयुक्त देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असून कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो हे माहित असतानाही महापालिका प्रशासनाने याकडे का दुर्लक्ष केले असा सवाल आयुक्त देशमुख यांना केला. शहरात दाखल होताच नागरिकांनी जागोजागी असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगारे दाखविले, ऐवढेच नसून रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे दाखविले आहे. शहरातील पावसाळ्याच्या अगोदर खड्डे का बुजविण्यात आले नाही, नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका खेळत, नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास यास कोण जबाबदार असे अनेक प्रश्न विचारून सुरूवातीलाच आयुक्त गणेश देशमुख यांना धारेवर धरले. याचबरोबर श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाच्या बाबतही त्यांनी संबंधीत विभागाला जाब विचारून धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे असे आदेश दिले. याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेऊन अर्धवट असणारे कामे तात्काळ पुर्ण करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्या सोडविण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशा सुचनाही कृषी विभागाबरोबरच बॅंक अधिकाऱ्यांनाही त्यांनी यावेळी दिल्या.