
श्रीनगर,दि.5(वृत्तसंस्था) – अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले आहे. अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर जवानांनी या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चकमकीदरम्यान पळून जाण्यात यशस्वी झालेल्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली. अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयातून त्याला अटक केली.
सोमवारी जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंड येथे जवानांचे पथक श्रीनगरला जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर ही चकमक सुरु झाली होती. यावेळी एक जवान शहीद झाला होता, तर एक जखमी झाला होता. यानंतर सुरक्षा जवानांनी परिसराला घेराव टाकत दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झाले. पहाटे 2 वाजेपर्यंत ही चकमक सुरु होती.




