गडचिरोली,दि.10 :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संवैधानिक दिनाचे औचित्य साधून दि. २६ नोव्हेंबर २0१८ रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर ग्राऊंडवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केले आहे.या आंदोलनादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरही आवाज उठविण्यात येणार असून केंद्रॅीय सामाजिक न्यायमंत्र्याची भेट घेण्यात येईल असे रुचीत वांढरे यांनी म्हटले आहे.
ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्या पासून जनगणनेची आकडेवारी अद्यापही कुठल्याही पक्षाने घोषित केली नाही आणि या मुळे ओबीसी समाजाची दशा झाली आहे तर ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी घेऊन तसेच केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी, ओबीसी शेतकर्यांच्या वनहक्क पट्टयासाठी लागणारी तीन पिढय़ांची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी शेतकर्यांना १०० टक्के सवलतीवर केंद्रात व राज्यात योजना सुरू करण्यात याव्यात, ओबीसी संवर्गाच्या कर्मचार्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसी समाजासाठी लोकसभा व विधान सभा स्वतंत्र निर्वाचन क्षेत्र निर्माण करण्यात यावे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे या व इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर ग्राऊंडवर धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे , कार्याध्यक्ष किरण कटरे , सुरज डोईजड , राहुल भांडेकर , तुषार वैरागडे , आदित्य डोईजड , विकेश नैताम , वैभव जुवारे , निशांत नैताम , चेतन पिंपळशेंडे , स्वप्नील घोसे ,बादल गडपायले , विपुल मिसार , करण ढोरे , शुभम चापले , चेतन शेंडे यांनी आवाहन केले आहे





