36.9 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home Top News नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्री

नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्री

0
42

नागपूर,दि.23 : कुणा कडेही नक्षलवादाचे साहित्य सापडले तर अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी अटक करायची वेळ आलीच तर सर्वप्रथम मलाच करावी लागेल, कारण मी सुद्धा तसे साहित्य वाचलेले आहे. परंतु ज्यावेळी देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळतील तर त्याच्यावर कारवाई करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने ते अधिकार दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन काम करणार नाही. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा विचारासाठी संविधानाच्या विरोधात काम करणार नाही, असे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारला मराठी नाट्य संमेलन कार्यक्रमात दिले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशिमबाग मैदानावरील राम गणेश गडकरी नाट्य नगरी येथे आयोजित कार्यक्रमाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, प्रफुल्ल फरकासे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर सातत्याने चर्चा होते,ती चर्चा होत राहावी. या देशाच्या मुळ रक्तातच सहिष्णुता आहे. या देशामध्ये एकदाच १९७५ साली अभिव्यक्ती च्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी देशाने इतक्या जोरात त्याला प्रत्युत्तर दिले. त्यावेळी सर्वात बलाढ्य शक्ती देखील उलथवून टाकण्याच काम या देशातील लोकांनी केले.या देशाच्या रक्तातून सहिष्णुता कुणीही काढू शकत नाही. सहिष्णुता हा आमचा विचार आहे,आचार आहे. जगाचा पाठीवर इतका सहिष्णू देश ज्यांच्यावर इतकी आक्रमणे झाली, ती आम्ही पचवले. त्यांना आमच्या संस्कृतीत सामाहून घेतले. जगाच्या पाठीवरून ज्यांना हाकलले गेले त्यांना आम्ही स्थान दिले. जगाने ज्यांना बहिष्कृत केले त्यांनाही सामाहून घेण्याची आमची संस्कृती आहे. त्यामुळे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही.