लाखांदुर,दि.18ः-डिजीटल होऊ पाहणाऱ्या देशात गावाबाहेर अख्ख आयुष्य वेशीवर ठेऊन भटक्या समाजातील लोकांची झोपड्या व दारीद्र्यातुन मुक्तता होईल काय ? या प्रतिक्षेत हे आयुष्य जगत आहेत. पावसाळा चालू असतांना तांड्यावरच्या प्लाँस्टिक कागदांचे पांघरून घेतलेल्या झोपड्या संवेदनशील होऊन बड्या प्रशासनाकडे भिक मागत असतांना, सहा महिण्यापुर्वी डाँक्टरी पेशा असलेल्या नंदूरकर दाम्पत्यांनी पाहिल्यांदा या गावाला भेट दिली व वस्तीवर वास्तव्याला असलेल्यांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधोपचार देण्यास सुरुवात करुन त्यांच्या आरोग्याच्या काळजीची हमी घेतली आहे.त्याच कळीत दरम्यान शनिवारला (दि.१७) साप्ताहिक उपचारासाठी आलेल्या डाँ.विजया राजेश नंदूरकर दाम्पत्यांनी नाथ जोगी समाजाच्या वस्तीवर गेल्या दोन वर्षापासुन पालावरची शाळा सुरू असलेल्या पालावरच्या शाळेवर, उघड्या माळ रानावर जाऊन वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केला.डाँ. विजया नंदूरकर यांनी नाथजोगी बांधवांना राखी बांधुन, मच्छरदानी व मिठाई वाटप केली आहे.
डाँ.नंदूरकर दाम्पत्य हे मुळचे पवनी येथील रहीवाशी असून, डाँ.विजया नंदूरकर यांनी तिन महिण्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढविली होती. निवडणुकीपुर्वी लाखांदुर दौरा करून साकोली जात असतांना, नंदूरकर दाम्पत्यांना कोडामेळी गावातील लोकांच्या समस्यांची जाणिव झाल्याने, त्यांनी वस्तीतील लोकांना मोफत साप्ताहिक वैद्यकीय सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. भटक्या विमुक्त विकास परिषदेचे प्रांत संयोजक दिलीप चिञिवेकर यांच्या माध्यमातून वस्तीतील उकांडा वडसकर यांच्या घरी भाड्याची खोली करून सेवा चालू केली आहे.