
जिल्हयातील पोषणतत्त्व गुणसंवर्धीत तांदूळ प्रकल्पाचे जिल्हाधिकारी यांनी केले सादरीकरण
गडचिरोली,दि.15 : पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत केंद्रीय स्तरावरील नागपूर येथे १० राज्यांच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच या कार्यशाळेसाठी आयोजक म्हणून गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला होता. या अनुषंगाने आरमोरी येथील जेना मिल याठिकाणी याठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील पोषणतत्व गुणसंवर्धित तांदळाच्या कामाचे सादरीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेटीला आलेल्या केंद्रीय समिती समोर केले.
राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्ट मार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता, केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण १५ जिल्ह्यांत पोषणतत्त्व गुणसंवर्धीत तांदूळ हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यात पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय १४ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याकरिता केंद्र शासनाच्या तसेच या प्रकल्पासाठी तयारी दर्शविलेल्या अन्य राज्यातील अधिकाऱ्यांसाठी, राज्य शासनाच्या वतीने दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस केंद्र शासनाचे एस. जगन्नाथन, सहसचिव, ग्राहक कल्याण मंत्रालय तसेच अन्न व नागरी पुरवठा उपस्थित होते. राज्य शासनाकडून महेश पाठक, प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन उपस्थित होते. नागपूर विभागाचे पूरवठा शाखेचे उपायुक्त रमेश आढे, त्यांच्याबरोबर राज्याचे सतीश सुपे सह सचिव, नेत्रा मानकामे अवर सचिव, निशा गारोळे कक्ष अधिकारी उपस्थित होते .या अधिकाऱ्यांसोबत अन्य १० राज्यांचे सचिव दर्जाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी सदर कार्यशाळेस उपस्थित होते. गडचिरोली जिल्हातील भेटीचे आयोजनाची जबाबदारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची होती तर यासाठी सहकार्य जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी केले. यावेळी टाटा ट्रस्टच्या गडचिरोली प्रतिनिधी सोनल डीसूझा उपस्थित होत्या.





