मुंबई,दि.16ः – राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार, खरीपासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर फळबागासाठी हीच मदत 18 हजार रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ओल्या दुष्काळाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी पीडित शेतकरी आणि फळबागांना भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले. अखेर राज्यपालांनी सर्वच स्तरावरून होणाऱ्या मागणीनंतर राज्यपालांनी ही घोषणा केली.
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी देखील माफ
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जारी केलेल्या मदतीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर 8 हजार रुपये आणि फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जाईल. खरीप आणि फळबाग अशा दोन्ही प्रकारच्या नुकसानीसाठी कमाल 2 हेक्टरपर्यंत भरपाई दिली जाईल. या मदत निधीसोबतच नुकसानग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांना जमिनीचा महसूल द्यावा लागणार नाही. सोबतच, अशा भागातील शेतकऱ्यांची शाळा आणि महाविद्यालयाची फी देखील माफ केली जाणार आहे. राज्यपालांनी ही मदत त्वरीत लागू करण्याचे आदेश दिले आहेत.




