24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ चंद्रपुरात आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन

चंद्रपुरात आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन

0
29

चंद्रपुर,दि.२६ ;स्थानिक चांदा क्लब ग्राउंड समोरील न्यू इंग्लीश क्रीडांगणाच्या पटांगणावर विदर्भातील एकदिवसीय दुसरी भव्य शेतकरी हक्क परिषद आज मंगळवार (दि.२६) ला आयोजित केलेली आहे. सकाळी ९ वाजतापासून या परिषदेला सुरुवात होत असून, दिवसभर विविध सत्र राबाविल्या जाणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेती व्यवसाय डबघाईस आली आहे. महाराष्ट्रात लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहे. वन्यप्राणी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान करीत आहे. आता आम्ही किती दिवस रडत बसणार आहोत.आता आम्ही रडणार नाही. तर लढणार आहोत, या विचारांना घेऊन ही भव्य शेतकरी हक्क परिषद असून,परिषदेचे उद््घाटन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी करणार आहे.तर अध्यक्षस्थानी आमदार बच्चू कडू राहणार आहेत. सोबतच शेतकरी नेते रघूनाथदादा पाटील, रेगारी राचूरे, अमर हबीब, प्रकाश पोहरे, राजकुमार पटले, अजित नवले, चंद्रकांत वानखेडे, विजय जावंधिया, वामनराव चटप आदी शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी हक्क परिषदेकरीता न्यू इंग्लीश क्रीडांगणाच्या पटांगणावर भव्य शामीयाना उभारला असून, सभास्थळाला बळीराजा विचारपीठ, असे नाव देण्यात आले आहे. सकाळी ११ वा. उद््घाटन सत्र पार पडणार आहे. दुपारी १२ वा. प्रथम सत्र सुरू होईल.
प्रथम सत्रामधे ‘वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान व शासनाने करावयाचे नियोजन’ या विषयावर चर्चा होणार आहे.दुसरे सत्र १ वा. सुरू होईल. यात ‘पीकविमा योजना व शासकीय कायदे तथा शेतकर्‍यांच्या मुलांना नौकरी व रोजगार’ या विषयावार चर्चा होणार आहे. दुपारी २ ते २:३0 पयर्ंत भोजन अवकाश राहील. तिसरे सत्र दुपारी २:३0 वा. सुत्र होईल, यात ‘शेतकर्‍यांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग : स्वामीनाथन आयोग’ या विषयावर चर्चा होणार आहे.
शेवटी ३:३0 वा. समारोपीय सत्र असेल यात ‘योध्दा शेतकरी’या विषयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर खुले सत्र होईल. त्यात शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे निरसण केल्या जाईल.
मागील एक महिण्यापासून विदर्भातील गावोगावी जावून शेतकर्‍यांमधे या हक्क परिषदेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विदर्भातून जवळपास दहा हजार शेतकरी परिषदेला उपस्थित राहतील, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. यासाठी नियोजनाची जय्यत तयारी सुरू असून, शेतकर्‍यांनी या परिषदेत आवर्जून उपस्थीत राहण्याचे आवाहन विठ्ठलराव बदखल, बळीराज धोटे, प्रा. विजय बदखल, रुद्रा कुचणकर, इंजि. दिलीप झाडे, सुनील मुसळे, प्रदीप बोबडे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, मुकेश वरारकर, अँड. डॉ. अंजली साळवे, अरविंद वांढरे, गणेश झाडे, सुनील भोयर, प्रा. जयवंत काकडे आदींनी केले आहे.