
पहिल्या टप्प्यात 237 गरोदर महिला व 1460 बालकांचे होणार लसीकरण
वाशिम, दि. 30 : बालकामधील आजार व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. क्षयरोग, कावीळ, पोलीओ, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला यासह अन्य आजारांसाठी बालकांचे लसीकरण केल्याने बालकांना सुरक्षितता येते. जिल्हयातील जोखीमग्रस्त भागातील जी 0 ते 2 वयोगटातील बालके आणि गरोदर माता सर्वेक्षणानुसार लसीकरणापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी राबविण्यात येणारी विशेष मिशन इंद्रधनुष्य 2.0 ही मोहिम यशस्वी करा. असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी विशेष मिशन इंद्रधनुष्य 2.0 मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समिती सभा जिल्हाधिकारी मोडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश अहेर, जिल्हा साथरोग अधिकारी सुनिल मेहकरकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सदीप हेडाऊ, वाशिम नगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भगत, युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. अमोल धंदर यांची उपस्थिती होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अहेर यांनी विशेष मिशन इंद्रधनुष्य 2.0 मोहिमेबाबत माहिती देतांना सांगीतले की, युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने 2 डिसेंबर 2019, 6 जानेवारी 2020, 3 फेब्रुवारी 2020 आणि 2 मार्च 2020 या चार टप्प्यात दर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरपासून सरु होणाऱ्या 162 आरोग्य सेवा सत्राव्दारे जोखीमग्रस्त भागातील सर्वेक्षणानुसार सुटलेल्या गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हयातील ग्रामीण भागातील 167 आणि शहरी भागातील 70 अशा एकूण 237 गरोदर महिलांचे तर 0 ते 2 वयोगटातील ग्रामीण भागातील 900 आणि शहरी भागातील 560 अशा एकूण 1460 बालकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. अहेर यांनी सांगीतले.





