
गोंदिया,दि.08ःक्षेत्रातील अनेक शेतकर्यांचे धानपिक आगीने जळून नुकसान झाले आहे. या घटनांचे तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच या घटनांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावे, असे निर्देश आ. अग्रवाल यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
गत काही दिवसांपासून गोंदिया विधानसभा अंतर्गत धानाच्या पुंजण्याला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही आग नैसर्गिकरित्या लागली की लावली गेली, असा संशय व्यक्त होत आहे. अशातच कामठा व नवरगाव कला शिवारात या घटनेची पुर्नरावृत्ती झाल्याची माहिती मिळताच आ. अग्रवाल यांनी घटनास्थळी प्रशासनासोबत दाखल झाले व नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोबत असलेल्या अधिकार्यांनी घटनांची तातडीने पंचनामे करण्याचे व मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिप सभापती शैलजा सोनवाने यांनी, शेतकरी बांधवाचे नुकसान भरुन निघावी म्हणून प्रती शेतकरी २0 हजार रुपये नुकसान भरपाई जिप मार्फत देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी कामठाचे सरपंच लिलेश्वर कुंभरे, प्रकाश सेवतकर, विजय लिल्हारे, ग्रापं सदस्य मिलन पाथोडे, जिप सदस्य विजय लोणारे, तलाठी ठाकरे, ग्रापं सदस्य किशोर लिल्हारे), तंमुस अध्यक्ष महेश मस्करे, बिट जमादार वरखडेढे, ग्रामसेवक प्रमोद मेर्शाम तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.




