गडचिरोली,दि.9: राज्य शासनाच्या सहकार्याने तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे. सुक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार पात्र आहेत. यामध्ये विशेष प्रवगासाठी अनुसुचित जाती/जमाती, महिला, अपंग व माजी सैनिक यांचेसाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आली आहे. 10 लाखावरील प्रकल्पासाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास तर 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात सर्वसाधारण गटात 10 टक्के स्वगुंतवणूक आहेत तर 25 टक्के अनुदान व 65 टक्के बँक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. विशेष प्रवर्गासाठी 5 टक्के स्वगुंतवणुक तर 35 टक्के अनुदान व 60 टक्के बँक कर्ज उपलब्ध आहे. शहरी भागात सर्वसाधारण गटामध्ये 10 टक्के स्वगुंतवणुक तर 15 टक्के अनुदान व 75 टक्के कर्ज दिले जाते. विशेष प्रवर्गात 5 टक्के स्वगुंतवणुक तर 25 टक्के अनुदान व 70 टक्के बँक कर्ज पुरवठा दिला जातो.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने निवड व अंमलबजावणी होईल. यासाठी विशेष CMEGP पोर्टल अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. अशारीतीने सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने यामध्ये अर्जदाराला कोणालाही भेटण्याची आवश्यकता नसते. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अर्जदारासाठी नि:शुल्क निवासी प्रशिक्षण आयोजित केले जाते. यासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये वयाचा पुरवा, शैक्षणिक पात्रता, तपशील, आधार कार्ड, व्यवसाय दस्ताऐवज, जातीचे प्रमाणपत्र, विशेष प्रवर्गासाठी पूरक प्रमाणपत्र आणि वाहन परवाना. अशारीतीने उद्योजकतेस प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे. यामध्ये 50 लाखापर्यंत प्रकल्प योजनेंतर्गत पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाचा फायदा करुन घ्यावा असे जिल्हा उद्योग केंद्राने निवेदनाद्वारे म्हटंले आहे.




