
भंडारा,दि.16ः भंडारा जिल्ह्यातील ग्रा. पं. राजेगाव हद्दीतील चिखली-हमेशा येथील २६ एकर सरकारी जागेवर गेल्या ३७ वर्षांपासून गडेगाव (भंडारा) येथील अशोक लेलँड कंपनी लि.ने अतिक्रमण केले आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी व अतिक्रमण तातडीने हटवावे, या मागणीसाठी राजेगाव (एमआयडीसी) ग्रामवासीयांनी विधिमंडळावर मोर्चा काढून लक्ष वेधले. मोर्चाचे नेतृत्व अचल मेश्राम, कुंजन शेंडे, शशी भोयर, अनिता शेंडे, शालिक गभाने, देवराव वासनिक आदींनी केले.यापुर्वी या आंदोलकांनी धरणे आंदोलन केले,जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला परंतु प्रशासन व कंपनी प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने आज राजेगाववासियांनी विधानभवनावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला.





