मुंबई,दि.26: राज्यात लॉकडाऊन असला तरी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. जनतेला जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळणार आहेत. त्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून जनतेचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना धान्याऐवजी थेट पीठ देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच लॉकडाऊनला जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाहीत. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशीन आणण्यात आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल, असे थोरात यांनी सांगितले.





