गडचिरोली दिं.23.: : भारतीय हवामान (IMD) खात्याने २०२० मधील उष्णतेबाबत अनुमान अहवाल जाहीर केला आहे. त्यामुळे यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असून नागरीकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. उष्ण वातावरणामुळे लोकांना होणारे आजार व सद्या सुरू असलेली कोरोना लढाई यामुळे दवाखान्यातील गर्दीबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरीकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण अगोदरच आरोग्य यंत्रणेचा कोरोनाबाबत लढा सुरू असल्याने तसेच आता येणा-या उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेची आहे अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
उष्णतेपासून होणारा धोखा लक्षात घेवून जिल्हास्तरावर विविध आराखडा तयार करून त्याबाबतचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मे महिन्यातील पहिल्या दोन आठवडयात विदर्भात तापमान ४५ अंश सेल्शीयस पेक्षा जास्त जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केले आहेत. याचवेळी भारतातील काही भागात ५१ अंश सेल्शीयस पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भासह गडचिरोली जवळील छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांचा समावेशही अति उष्ण तापमानात करण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेदरम्यान काय करावे आणि काय करू नये याबाबत सर्वांसाठी उपाययोजना :
हे करा :
1. घरातच रहा अकारण बाहेर पडू नका. रेडिओ ऐका, टीव्ही तसेच वर्तमानपत्र पहा. उष्णतेबाबत व कोविड-१९ बाबत तपशील पहा.खबरदारी घ्या.
2. काही वेळा-वेळाने मुबलक पाणी प्या. तहान लागली नसेल तरीही थोडे थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे. द्रव प्रतिबंधित आहार ज्यामध्ये मुत्राशय, हरदय विकार व लिवर बाबत यांच्यासाठी वर्ज करण्यात आला आहे, त्यांनी जास्त पाणी पिण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. आपले शरीर हायड्रेट राहण्यासाठी, घरगुती तयार केलेली पेय यामध्ये लिंबू पाणी, लस्सी, ताक, तोराणी-तांदुळापासून तयार केलेले पेय किंवा ओआरएस घ्यावे.
4. हलके व हलक्या रंगांचे, ढिल्ले व कॉटनचे कपडे वापरा.
5. बाहेर पडू नका. मात्र जर बाहेर जावेच लागले तर डोके झाका, तोंडाला रूमाल लावा व छत्रीचा वापर करा. कुठेहा इतरत्र स्पर्श करणे टाळा.
6. बाहेर सामाजिक अंतर पाळा. हात वारंवार स्वच्छ धुवा.
7. घरात प्रत्येक व्यक्तीने वेगळे टॉवेल वापरावेत. तसेच ते वरवर स्वच्छ धुवावेत.
इतर आवश्यक खबरदारी
• घरात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा.
• घरातील वातावरण थंड राहण्यासाठी उपाययोजना करा. घराजवळ निवारा करून सावली तयारी करा. खिडक्यांना पडदे लावून रात्री त्या उघडया असूद्या. घरासतील खालच्या माळयावरती राहण्याचा प्रयत्न करा.
• जास्त उष्णतेवेळी पंख्यांचा वापर करा. ओलसर कपडे, थंड पाण्याने आंघोळ करून उष्णतेवर मात करा.
• जर अशक्तपणा, ताप, डोके दुखी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• घरातील पाळीव जनावरे सावलीत ठेवा. त्यांनाही मुबलक पाणी देण्यासाठी उपाययोजना करा.
हे करू नका
1. बाहेर पडू नका. मात्र जावे लागलेच, तर दुपारी १२ ते ३ दरम्यानचे जास्त उष्ण वातावरण टाळा.
2. डोके व चेहरा न झाकता बाहेर जावू नये.
3. उष्ण तापमानावेळी म्हणजे दुपारी १२ ते ३ वा.च्या दरम्यान स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक करतेवेळी दरवाजे खिडक्या उघडया ठेवा.
4. अल्कहोल, चहा, कॉफी तसेच सॉफ्ट ड्रींक टाळा. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
5. जास्त प्रथिनेयुक्त, तिखट व तेलकट अन्न टाळा. शिळे अन्न अजिबात खावू नका.
6. नाक, तोंड व डोळयांना हात न धुता हात लावू नका.
7. आजारी माणसाच्या अगदी जवळ राहू नका.
8. जर आपण आजारी असाल तर बाहेर जाणे टाळा.
व्यावसायिक, नोकरदार व कामगारांसाठी आवश्यक सूचना
हे करा :
1. कामाच्या ठिकाणी स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे.
2. प्रत्यक्ष सुर्य प्रकाशात काम करणे टाळावे. उन्हात काम करत असतीलच तर त्यांचे डोके व चेहरा पुर्ण झाकलेला असावा. उदा. शेतात काम करणारे लोक.
3. जास्तीत जास्त कामाचे तास हे दुपारी १२ ते ३ सोडून नियोजित करा.
4. बाहेर उन्हात काम असल्यास जास्तीत जास्त विश्रांती कालावधी ठराविक वेळेनंतर ठेवा.
5. गरोदर असलेल्या महिला व औषधे घेत असलेल्यांसाठी विशेष काळजी घ्यावी.
6. प्रत्येक कर्मचा-याने तोंड झाकणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून काम करणे व वारंवार हात स्वच्छ धुणेही आवश्यक आहे. काम करताना चेहरा व डोळयांचा स्पर्श टाळावा.
7. प्रत्येक कर्मचारी यांच्यात जेवताना व इतर कामांमध्ये १ ते १.५ मीटर अंतर ठेवावे.
8. स्वच्छता कामगारांसाठी मास्क, हातमोजे व डोके झाकण्यासाठीची व्यवस्था केलेली असावी.
9. कामावरून घरी गेल्यावरती प्रत्येकाने स्वच्छ आंघोळ व कपडे स्वच्छ धुवावेत,
10. जर कोणी कामगार अशक्त असेल किंवा आजारी असेल तर सुपरवायझर किंवा संबंधित व्यवस्थापकास सांगावे.
हे करू नका
1. कामाच्या ठिकाणी तंबाखू ओढणे व खाणे टाळावे. थुंकू नये.
2. इतरांना हस्तोंदलन व मिठी मारणे टाळावे.
3. इतरांजवळ जाणे टाळा. आजारी व्यक्तीजवळ राहू नका.
4. जर तुम्ही आजारी असाल तर कामावर जावू नका.
पोलीस व वाहतूक पोलीस यांनी घ्यावयाची काळजी :
• दिवसा काम करताना थंड जॅकेट परिधान करावे.
• ठराविक अंतरावरच वाहने उभी करावीत. चालकांची कागदपत्रे पडताळताना कमीत कमी स्पर्श करा. तसेच इतरांच्या वाहनाला स्पर्श करणेही टाळा.
• आपला चेहरा, डोके झाका. हात वारंवार स्वच्छ ठेवा. तोंडाला स्पर्श करणे टाळा.
• ठराविक अंतराने भरपूर पाणी प्या, जरी तहान लागली नसेल तरी.
• मास्क वापरा व ते काही कालावधीनंतर बदला.
• उन्हापासून बचाव करणारे साहित्य उदा. चष्मे, सन्स क्रीम वापरा.
• जास्तीत जास्त तरूण कर्मचारी दिवसा वाहतूक नियंत्रणासाठी निवडणे गरजेचे आहे.
• कामावरून घरी गेल्यावर स्वच्छ आंघोळ करा व कपडे धुवा.
वृद्ध लोकांनी घ्यावयाची काळजी :
• जास्तीत जास्त घरातच रहावे. बाहेर बोगत, मंदिरामध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
• घर थंड ठेवावे. दरवाजे व खिडक्यांना पडदे लावून त्या उघडयाच ठेवाव्यात.
• सतत हात स्वच्छ ठेवावे. जेवणापुर्वी हात व्यवस्थित स्वच्छ करावेत.
• जर डोकदुखी, ताप, खोकला किंवा अशक्तपणा जाणवू लागला तर त्वरीत डॉक्टरांना सांगा.
जर आपणा जवळ कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर –
• त्यांचे हात स्वच्छ ठेवण्यासाठी सांगा किंवा धुण्यासाठी मदत करा.
• वेळेवर जेवण व पाणी घेण्यासाठी सांगा व त्यासाठी मदत करा.
• त्यांना मदत करताना तुमचा चेहरा झाका. प्रत्यक्ष स्पर्श करणे टाळा.
• त्यांना स्पर्श करण्यापुर्वी व नंतर हात स्वच्छ धुवा.
• जर आपणालाच सर्दी खोकला किंवा ताप असले तर वृद्धांजवळ जाणे टाळा. इतर कोणाला तरी मदत करण्यास सांगा.
अशा प्रकारे उष्णतेच्या काळात नागरीकांनी खबरदारी घेवून होणारा त्रास टाळावा. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करा. कोविड-१९ संसर्ग जास्त उष्णतेमुळे होत नाही अशा तसेच अन्य चुकीच्या बाबींवर विश्वास ठेवू नका. उष्ण वातावरण व कोविड-१९ संसर्ग यामुळे आपणाला व आपल्या कुटुंबाला त्रास होवू नये यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गडचिरोली प्रशासनाकडून करण्यात येत आहे.





