
वर्धा,दि.25ः जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील 33 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज शनिवारच्या पहाटे सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लीपुर येथील रहिवासी हमीद पठाण वय 33 वर्षे हा व्यवसाय करण्याकरिता समुद्रपूर येथे पत्नीसोबत वास्तव्यास होता. अल्लीपुर मूळ गाव असल्यामुळे तो गावात सतत येत असायचा.24 एप्रिल रोजी अल्लीपुर येथे त्याच्या भावाकडे आला असता, त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या युवकाची हत्या अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून झाली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हमीद पठाण या युवकाचा मृतदेह गावातील वसंता आत्राम यांच्या घराजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी वसंता आत्राम याला अल्लीपुर पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.





