43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण,दोन्ही पक्षांचे एकमेकावर आरोप-प्रत्योरप

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण,दोन्ही पक्षांचे एकमेकावर आरोप-प्रत्योरप

0
254

blank

आमगाव,दि.07:सालेकसा तालुक्यातील गांधीटोला (सालईटोला) येथील शासकीय वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन खासगी व शासकीय वनविभागाच्या जागेवरील वृक्षांची कत्तल केल्याची तक्रार गांधीटोला येथील भूवन मेंढे यांनी सालेकसा पोलीस स्टेशन केली. मात्र संबंधित विभागाकडून थातूरमातूर चौकशी करुन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला गांधीटोला येथील शामराव पाथोडे व मुलगा पवन पाथोडे तसेच प्रकाश पाथोडे यांनी संगणमत करुन मेंढे यांच्या शेतातील १२ सिंहनाच्या वृक्षांची कत्तल केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर लागून असलेल्या शासकीय जमिनीतील गट क्रमांक १८८,१८९,१९१ सुद्धा झाडांची कत्तल केल्याचा आरोप केला आहे. सदर गट क्रमांकावर अतिक्रमण केले आहे. या घटनेची तक्रार भूवन मेंढे यांनी पोलीस स्टेशन तसेच वनविभागाला केली. संबंधित विभागाने तक्रारीच्या आधारावर पंचनामा केला. शामराव पाथोडे यांनी आठ बल्या तोडल्याचे मान्य केले. मात्र वनविभागाकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे.

पाथोडे पिता पुत्रांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत गांधीटोलाच्यावतीने १ फेब्रुवारीला ठराव मंजूर करुन गट क्रमांक १८९, १८८, १९१ मधील संपूर्ण जागेची वनविभागाकडून मोजणी करुन वनीकरण करण्यात यावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, अशी शिफारस केली आहे. तसेच वनसमितीने सुद्धा याबाबत वन विभागाने चौकशी करण्याची मागणी केली आहे.वृक्षांची कत्तल व जीवे मारण्याची धमकी याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्या संदर्भात दोन्ही पक्षाला बोलाविण्यात आले होते. पंचनामा करण्यात आला आहे. सध्या तपास सुरु असल्याचे सालेकसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजकुमार डुणगे यांनी म्हटले आहे.

वृक्षाची कत्तल केल्याची तक्रार भूवन मेंढे यांनी दिली होती. त्यानुसार चौकशी केली व गैरअर्जदाराने वृक्षांची कत्तल केल्याचे कबूल केले. एकूण २५ वृक्षांच्या बल्या जप्त केल्या असून त्यानुसार दंड करण्यात येईल. शेतामध्ये टाकण्यात आलेल्या औषधीच्या बाबतीत दोन्ही पक्षावर शंका  असल्याचे साखरीटोलाचे क्षेत्र सहाय्यक संजय पटले यांचे म्हणने आहे.

या प्रकरणात गावातील काही मंडळी राजकारण करीत असून मुद्दाम प्रकरण वाढवित आहेत. वृक्षांची कत्तल केली हे खरे आहे पण ते आम्ही परत केले. भुवन मेंढे यांनी मुदतबाह्य औषधी शेतात टाकल्याची तक्रार मी पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग व वनविभागाला केली.त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात यावी असे पवन पाथोडे यांचे म्हणने आहे.

blank