
अर्जुनी मोरगाव,दि.21ः विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते.धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते.पाण्याअभावी कोणत्याही शेतकऱ्यांची पीकहानी होऊ नये यादृष्टीने विधानसभा क्षेत्रात किमान १८ तास वीजपुरवठा सुरू ठेवावा असे निवेदन आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी ऊर्जामंत्री ना नितीन राऊत यांना दिले.
शेतकरी सदैव कुठल्या ना कुठल्या तरी संकटाने ग्रासलेला असतो.कधी कोरडा दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस . पाऊस संतुलित आला तर किडीचा प्रादुर्भाव सतावतो.पण बहुतांशी सिंचनाच्या पाण्याअभावी हातचा घास हिरावून घेण्याचे प्रकार अधिक घडतात.सिंचनाचे पाणी उपलब्ध होते मात्र कृषिपंपाना केवळ ६ तास वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उद्भवत असतात.वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्री-बेरात्री वारंवार शेतकऱ्यांना शेतात पंप सुरू करण्यासाठी जावे लागते.त्यासाठी किमान १८ तास वीजपुरवठा करावा या मागणीचे आ चंद्रिकापुरे यांनी उर्जामंत्र्यांना एप्रिल महिन्यात पत्र दिले होते.मात्र अद्याप समस्या सुटली नाही.त्यांनी २१ जून रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला. ना राऊत यांनी यावर सकारात्मक उत्तर दिले. मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे निवेदन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण मुंबई यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याकरीता ना. डॉ. नितीन राऊत यांनी निर्देशीत केले आहे. यामुळे हा प्रश्न निकाली निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





