25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी – विभागीय आयुक्त संजीवकुमार

कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी – विभागीय आयुक्त संजीवकुमार

कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा

0
149

वर्धा, दि २४ :- जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, वास व चव न समजणे, श्वास घेण्यास त्रास, डायरिया आणि इन्फ्लुएन्झा सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घ्यावी. जास्तीत जास्त चाचण्या झाल्यास प्राथमिक अवस्थेत रुग्ण शोध घेऊन रुग्णांवर लवकर उपचार होतील आणि त्यांच्या माध्यमातून होणारा रोगाचा प्रसार थांबवता येईल, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी आज दिल्यात.

आज वर्धा जिल्हा परिषद सभागृहात कोविड 19 संदर्भात जिल्ह्यात राबवलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्ण ओळख लवकर होण्यासाठी महत्वपूर्ण सूचना केल्यात. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे  उपस्थित होते.

संजीव कुमार यांनी वर्धा जिल्ह्याने कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक करून शाबासकी दिली. जिल्ह्याने आतापर्यंत केलेले काम उल्लेखनीय आहे. मात्र आता यापुढे जिल्हाबंदी उठल्यानंतर, परिवहन सुरू झाल्यावर कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने जिल्ह्याचे तयारी असणे अत्यंत आवश्यक आहे.  यासोबतच जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची सुद्धा गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून रोज घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. हे सर्वेक्षण कशासाठी करायचे आहे?  याची माहिती आणि जाणीव जागृती सर्वेक्षण पथकाच्या सोबतच गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी.

ताप, खोकला, घसा खवखवणे, डोके दुखणे, चव व वास न समजणे, डायरिया, थकवा यासारखी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचा लवकर शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण आवश्यक आहे. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या अशा सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध प्राथमिक अवस्थेत होऊन त्यांच्यावर लवकर उपचार करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि जनतेच्या मनात एक विश्वासाचे वातावरण तयार होईल.

यासोबतच जिल्ह्यातील अति जोखमीच्या रुग्णांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.  अशा रुग्णांचे सुद्धा सर्वेक्षण करण्यात यावे. यामध्ये मधुमेह, क्षयरोग, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार अशा  रुग्णांचा समावेश करावा अशा रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची तातडीने चाचणी करावी आणि त्यांच्यावर ती तात्काळ उपचार करावेत लवकर उपचार मिळाल्यास रुग्ण गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखता येईल आणि त्यांचे प्राण वाचवता येतील.

या सर्वेक्षणाचा रोज आढावा घेण्यात यावा रोज गाव निहाय, वार्ड निहाय तपासण्यात आलेल्या रुग्णांची यादी करून त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. याचा रोज आढावा घेतल्यास आपल्या जिल्ह्याला पुढील गंभीर परिणामांपासून वाचवणे शक्य होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच गावागावात हँडवॉश स्टेशन तयार करावेत,  तिथे पुढील तीन महिने हँडवॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मास्कचा वापर प्रत्येक व्यक्ती करत असल्याची खात्री करावी. वापर न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी. सोशल डिस्टंसिंगचे पालनही आवश्यक असून त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी यांना केल्यात.

या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत,  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगताप, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सर्व तहसीलदार, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी उपस्थित होते.