वर्धा,दि.30 एप्रिल : महात्मा गांधी आणि विनोबा भावे या दोन महानुभावांची कर्मभूमी असल्यामुळे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंत तब्बल एक कोटी 59 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.यावरून वर्धा जिल्ह्यातही तळीरामांची तलफ किती जोरदार आहे हे स्पष्ट दिसून येते. वर्ध्यात दारूबंदी असली तरी येथे दारूचे पाट वाहतात. हे नवे नाही. परंतु राज्यात लॉकडाऊन आहे. त्यातही दारूची दुकाने बंद आहेत. शिवाय जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहनेही जिल्ह्यात आणायची असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागते. याकरिता जिल्ह्याच्या सीमेवर तब्बल 18 चेकपोस्टवर उभे करण्यात आले आहेत. येथे 24 तास पोलिस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तैनात आटहेत. असे असताना एवढा दारूसाठा जिल्ह्यात आला कसा, हा प्रश्न सर्वांनाच बचुकळ्यात टाकणारा आहे.या दारूबंदीच्या जिल्ह्यात पोलिसांकडून तब्बल 92 लाख 96 हजार 45 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 350 गुन्हे दाखल करुन 144 आरोपींना अटक करण्यात आली आहे.





