गडचिरोली,दि.08-आमचा हसता खेळता परिवार नक्षलवाद्यांमुळे उद्धवस्त झाला. मी, सृजनक्का आम्ही सर्व भावंडे एकत्र गुण्या-गोविंदाने राहत असताना नक्षली त्यांच्यासाठी जेवण बनवून आणण्यासाठी आमच्यावर दबाव आणत असत. सृजनक्का ही त्यांना जेवण द्यायला जात असे आणि एक दिवस तिला भुलथापा देऊन नक्षली कायमचे आपल्यासोबत घेऊन गेले. यामुळे आमचा सुखी परिवार दु:खाच्या खाईत लोटल्याची भावना सृजनक्काची बहीण पोटरी डोलू पल्लो हिने व्यक्त केले. तिला मी व आमचे वडील चैतू अर्का आत्मसर्मपण करण्यासाठी नेहमीच आग्रह करत होतो. पण, तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तिने आमचे ऐकले असत तर कदाचित ती आज सुखी समाधानाचे जीवन जगत असती, अशी खंत सृजनक्काची बहीण पोटरी पल्लो हिने बोलून दाखवत नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडून जे आदिवासी तरुण-तरुणी नक्षलींसोबत गेले आहेत त्यांनी आत्मसर्मपण करावे, असे आवाहनही तिने केले आहे.
जहाल नक्षली सृजनक्का हिचा भाऊ पेका चैतू अर्का याने सांगितले की, नक्षली हे आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी आमच्या अल्पवयीन मुलांचाही वापर करून घेण्यासाठी मागे पुढे पाहित नाही. यामुळेच माझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व नक्षलींच्या नजेरपासून त्यांना लांब ठेवण्यासाठी मुलांना इतरत्र शिक्षणासाठी पाठविले आहे. नक्षल्यांनी आमच्या आदिवासी बांधवांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेत आदिवासी बांधवांना विकासापासून कोसो दूर ठेवले आहे. म्हणूनच आदिवासी तरुणांनी नक्षलवाद्यांपासून लांब राहण्याचे आवाहन करत लोकशाही पद्धतीने आपल्या भागाचा आपण विकास करण्यासाठी हातभार लावावा आणि यासाठी स्थानिक आदिवासी युवकांनी एकत्र येण्याची आवाहन त्याने केले आहे.
नक्षलवाद्यांनी जल, जगल, जमिनीच्या नावाखाली आदिवासी बांधवांच्या भोळे-भाबडेपणाचा फायदा घेत स्वत:च्या फायद्यासाठी आजपर्यंत उपयोग करून घेतला आहे. गेली चार दशकांपासून नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या आड येत येथील निरपराध बांधवांच्या भोळे-भाबडेपणाचा फायदा घेत आहेत. जिल्ह्यातील ५३३ निरपराध आदिवासींचा खून नक्षलवाद्यांनी केला आहे. पोलिस -नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी देखील वारंवार सांगितले की, जर आमच्या मुलांनी आमचे ऐकले असत तर आज ते सुखी जीवन जगत असते, आज मृत नक्षली सृजनक्काच्या कुटुंबीयांनी देखील हीच बाब अधोरेखीत केली आहे.




