सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी उपपरिसरातील प्राचार्य आणि विद्यार्थ्यांशी संवाद

0
18

मुंबई, दि. २९ एप्रिल: मुंबई विद्यापीठाची ध्येय-धोरणे, नाविण्यपूर्ण उपक्रम, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक परिक्षण अशा विविध विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी उपपरिसरातील प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. २५ एप्रिल २०२२ रोजी दक्षिण रत्नागिरी भागातील फिनोलेक्स एकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्य संवादासाठी २२ प्राचार्य उपस्थित होते, तर २६ एप्रिल रोजी उत्तर रत्नागिरी भागातील दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या बैठकीत ३६ प्राचार्यांशी संवाद साधण्यात आला. २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्य संवादाच्या कार्यक्रमास ४५ विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि महाविद्यालयातील व्यवस्थापनाचे ५ प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व प्राचार्य संवादादरम्यान कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शैक्षणिक परिक्षण, महाविद्यालयीन स्वायत्तता आणि विविध सांविधिक समित्या अशा अनुषंगिक विषयांवर मार्गदर्शन केले. विविध प्राचार्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्यात आले.

विद्यार्थी संवाद कार्यक्रमाअंतर्गत २५ एप्रिल रोजी फिनोलेक्स एकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित विद्यार्थी संवादात विविध महाविद्यालयातील २५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर २६ तारखेला विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास १८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २७ एप्रिल रोजी विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय येथील ५५ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तर २७ तारखेला सायंकाळी ५ वाजता विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसरातील ४० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या विद्यार्थी संवादाच्या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न, शंका आणि समस्या उपस्थित केल्या. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली. बदलत्या शिक्षणपद्धतीनुसार विद्यापीठाने अधिकाधीक अभ्यासक्रमांना कौशल्याची जोड दिली असून, कौशल्याधारीत शिक्षण पद्धतीचा स्विकार तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणपद्धतीत होणाऱ्या बदलांना अनुषंगून विद्यापीठामार्फत पावले टाकली जात असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. येत्या काळात तंत्रज्ञानाधिष्ठीत शिक्षण हे अधिक बळकट होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनीही तयारी करावी तसेच या शैक्षणिक वर्षापासून अनेक नव्या उपक्रमांना सुरुवात केली जात असून अनेक नविन अभ्यासक्रम राबविले जाणार असल्याचे प्र- कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी उपपरिसरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव सुधीर पुराणिक आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील उपस्थित होते.