
सडक अर्जुनी,दि.१६-: कोण म्हणतो की फक्त शेतकरीच शेतातून उत्पन्न काढू शकतो.परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेहळीटोला पंचायत समिती सडक अर्जुनी यांनी राबविलेल्या एका नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमातून मक्याच्या पिकाची अर्धा एकर मध्ये लागवड करून तब्बल 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविलेले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष शेतीचे ज्ञान मिळाले असून श्रम प्रतिष्ठा, नियोजन आणि उद्योजकतेचे धडे ही मिळाले आहेत. शाळेच्या परिसरातील उपलब्ध जागेचा योग्य उपयोग करून शाळेतील वर्गमित्र असलेले शिक्षक श्री जितेंद्र काशिवार सर व श्री संतोष कुमार परतेकी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक्ष विद्यार्थ्यांच्या सहभागातून आणि पालकांच्या श्रमदानातून ठिबक सिंचन पद्धतीने व चीन तंत्रज्ञानाचा वापर करून मका पिकाची शाळेत लागवड करण्यात आली .जमीन तयार करणे ,पेरणी, खत व्यवस्थापन , तन नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन तसेच पीक संवर्धन या सर्व प्रक्रिया मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण देखभालीमुळे मक्याचे पीक भरघोस आले .पीक काढनीनंतर मक्याची विक्री करण्यात आली आणि त्यातून सुमारे 40 हजार रुपये उत्पन्न शाळेने प्राप्त केले. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न मिळता कृषी तंत्रज्ञान ,आर्थिक नियोजन समुहकार्य आणि स्वावलंबन यांचे महत्त्व समजले .शाळेच्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.




