शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग मोकळा-ना.विनेाद तावडे

0
8

मुंबई, दि.02 :- विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेत्तर भरती करणार असून आता महाविद्यालयांना सदरील जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याच बरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज दिली.

राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त असल्याबाबत चर्चा ही सर्वदूर सुरु होती. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. अध्यापकांच्या 3580 जागा, शारिरीक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4738 पदे येत्या काळात भरण्यात येतील असेही श्री. तावडे यांनी सांगितले.तसेच, तासिका तत्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून त्यामध्ये सुध्दा घसघशीत वाढ करण्यात आली आहे. महाविद्यालय व विद्यापीठातील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.