गोंदिया,दि.20 : राष्ट्रपुरुषांप्रतिचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे उभे केले जातात. मात्र, संबंधितांकडून देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली जात नाही. प्रसंगी पुतळ्याची विटंबना होऊन जातीयवाद निर्माण होण्याचे प्रकार घडतात. त्यावर चाप बसण्यासाठी राज्य शासनाने पुतळा धोरण निश्चित केले आहे.राज्य शासनाने पुतळा उभारणीबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यापुढे दोन किलोमीटरच्या परिसरात एका राष्ट्रपुरुषांचा एकच पुतळा उभारता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी बंधनकारक आहे. पुतळा खासगी जागेत उभारायाचा असला तरी त्या जागेबाबत कोणताही वाद नाही, याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित पोलिस ठाण्याकडून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे पुतळे उभारण्यावर नियंत्रण येणार आहे.
अशा आहेत सूचना :
- जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही.
- जागेबाबतच्या मालकी हक्काबाबत वाद नसावा.
- पुतळा उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर ती जागा अन्य प्रयोजनासाठी कुणालाही वापरता येणार नाही.
- पुतळा बसविण्यासाठी सर्व तपशीलासह मुख्य वास्तुशास्त्रज्ञ किंवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयालयाची मान्यता बंधनकारक.
- पुतळ्यामुळे गाव किंवा शहराच्या साैंदर्यात बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावा.
- पुतळ्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचा तपास करून तसे नाहरकत प्रमाणपत्र संबंधित पोलिस ठाण्याकडून घेणे बंधनकारक.
- वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही.
- भविष्यातील रस्ते रुंदीकरणाला बाधा येणार नाही.
- पुतळ्याची देखभाल, पावित्र्य राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची राहील.
- पुतळा उभारताना संबंधित राष्ट्रपुरुषांचा पुतळा दोन किलोमीटर परिसरात नसावा.
- पुतळा उभारण्याचा ठराव एक वर्षापेक्षा जुना नसावा.